जळगाव (प्रतिनिधी: सरिता महाजन): शहरातील रामेश्वर कॉलनी मेहरूण येथील रोजी आज श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय भारताच्या गौरवशाली इतिहासातील प्रेरणादायी वीरांच्या शौर्य व पराक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, धैर्य, नागरी जाणीव आणि मूल्यांची रुजवणूक व्हावी, या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या ‘वीर गाथा 6.0’ उपक्रमांतर्गत मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, दूरदृष्टी, नेतृत्वगुण, न्यायप्रियता, शिस्त, स्त्री-सन्मान आणि रयतेप्रती असलेली बांधिलकी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृतीप्रधान उपक्रम घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंगांचा अभ्यास करून त्यातून मिळणारी मूल्ये आपल्या शब्दांत मांडली.

‘वीराकडून मला मिळालेली शिकवण’ ठरला विशेष आकर्षण
कार्यक्रमातील ‘वीराकडून मला मिळालेली शिकवण’ हा उपक्रम विशेष आकर्षण ठरला. विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील विविध प्रसंगांचा अभ्यास करून त्यातून मिळालेली महत्त्वाची शिकवण निवडली.
काही विद्यार्थ्यांनी धैर्य, तर काहींनी नेतृत्व, शिस्त, कर्तव्यनिष्ठा, न्याय, स्त्री-सन्मान, स्वाभिमान, निर्णयक्षमता आणि रयतेची सेवा या मूल्यांवर आपले विचार मांडले. ‘शिवाजी महाराजांकडून मला काय शिकता आले?’ या प्रश्नाचा विचार करत विद्यार्थ्यांनी ही मूल्ये दैनंदिन जीवनात कशी आचरणात आणता येतील, याबाबत कृती-संकल्पही मांडले.
शौर्यगाथेतून जबाबदार नागरिकत्वाचा संदेश
कार्यक्रमात शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंगांचे कथन, विद्यार्थ्यांची भाषणे, शिवकालीन प्रसंगांचे सादरीकरण तसेच विविध मूल्याधारित उपक्रम घेण्यात आले. शौर्य म्हणजे केवळ युद्धातील पराक्रम नसून अन्यायाविरुद्ध उभे राहणे, योग्य निर्णय घेणे, कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणे आणि समाजाप्रती जबाबदारी स्वीकारणे, असा व्यापक संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांनी ‘मी शिवरायांकडून काय घेणार?’ या विषयावर स्वतःचे कृती-संकल्प मांडले. शाळेतील शिस्त पाळणे, शिक्षक व पालकांचा आदर करणे, मुली व महिलांचा सन्मान करणे, परिसर स्वच्छ ठेवणे, पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि जबाबदार नागरिक बनणे, अशा संकल्पांचा त्यात समावेश होता.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना इतिहास केवळ पाठ्यपुस्तकातून न शिकता महान व्यक्तिमत्त्वांच्या जीवनकार्याचा अभ्यास करून त्यांच्या विचारांचे आपल्या आचरणाशी नाते जोडण्याची संधी मिळाली. त्यामुळे ‘वीर गाथा 6.0’ हा उपक्रम इतिहास, मूल्यशिक्षण, देशभक्ती आणि नागरिकत्व यांचा सुंदर संगम ठरला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक मुकेश नाईक, पर्यवेक्षिका शितल कोळी व रूपाली आव्हाड यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
“शिवरायांचे शौर्य जाणून घेऊया, त्यांचे विचार समजून घेऊया आणि त्यांच्या मूल्यांना आपल्या आचरणातून जपूया,” या प्रेरणादायी संदेशातून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.








