जळगाव (प्रतिनिधी: सरिता महाजन):मेहरूण डिजिटल युगात मोबाईल, मेसेज आणि सोशल मीडियाचा वाढता वापर होत असताना विद्यार्थ्यांनी काही काळ डिजिटल साधनांपासून दूर राहून कागदावर पेनने आपल्या भावना आणि विचार व्यक्त करण्याचा अभिनव उपक्रम मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात राबविण्यात आला. जागतिक पत्रलेखन दिनानिमित्त ‘मनातलं पत्र… आपल्या माणसांसाठी!’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांना, आजी-आजोबांना, आवडत्या शिक्षकांना, मित्र-मैत्रिणींना तसेच निसर्गाला उद्देशून मनमोकळी पत्रे लिहिली. विद्यार्थ्यांनी आपल्या भावना, अनुभव, आठवणी आणि भविष्यातील स्वप्नांना शब्दरूप दिले.
विशेष म्हणजे, ‘२०२६ मधून २०३६ ला पत्र’ या आगळ्यावेगळ्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी भविष्यातील स्वतःसाठीही पत्रे लिहिली. या माध्यमातून विद्यार्थ्यांनी भविष्यातील ध्येय, अपेक्षा आणि स्वप्नांचा वेध घेतला.
पत्रलेखनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विचार मांडणी, प्रभावी संवाद, सर्जनशील विचार, कल्पनाशक्ती, भाषिक अभिव्यक्ती, शुद्धलेखन आणि सुंदर हस्ताक्षर या कौशल्यांचा प्रत्यक्ष सराव करता आला. या उपक्रमातून संवादकौशल्य (Communication), सर्जनशीलता (Creativity), चिकित्सक विचार (Critical Thinking) तसेच सामाजिक व भावनिक कौशल्यांचा विकास करण्यावर विशेष भर देण्यात आला.
विद्यार्थ्यांनी लिहिलेली पत्रे शाळेत तयार करण्यात आलेल्या ‘पत्रपेटी’मध्ये जमा करण्यात आली. त्यातील उत्कृष्ट पत्रांची निवड करून विद्यार्थ्यांकडून वर्गासमोर वाचन करून घेण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यासोबतच आपल्या भावना प्रभावीपणे व्यक्त करण्यास प्रोत्साहन मिळाले.
आजच्या वेगवान डिजिटल युगात लोप पावत चाललेल्या पत्रलेखनाच्या संस्कृतीचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे आणि ‘लिहिणे’ ही केवळ परीक्षा-केंद्रित बाब नसून भावनिक व सर्जनशील अभिव्यक्तीचे प्रभावी माध्यम आहे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
विद्यालयाचे मुख्याध्यापक मुकेश सुरेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांनी या उपक्रमाचे नियोजन व आयोजन केले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत “डिजिटल संवादासोबत हस्तलिखित संवादही जपूया” असा संदेश दिला.








