जळगाव(प्रतिनिधी ): अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या रेल्वे पुलांच्या दुरुस्तीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलिस प्रशासनाने वाहतुकीत तात्पुरता बदल केला असून नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई-नागपूर बायपास महामार्गावरील भुसावळ-आसोदा रेल्वे पुलावरील रस्ता तसेच पाळधी-भुसावळ मार्गावरील सुरत रेल्वे पुलावरील रस्ता ३० व ३१ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे खचला आहे. संबंधित विभागाकडून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून हे काम पुढील चार ते पाच दिवसांत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३३ (१)(ब) अंतर्गत अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार तरसोद फाटा ते पाळधी गाव दरम्यानच्या बायपास मार्गावरील वाहतुकीत १ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री १२.०१ वाजल्यापासून ५ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत तात्पुरता बदल करण्यात आला आहे.
शहर वाहतूक शाखा व जिल्हा पोलिस प्रशासनाने अपघात टाळण्यासाठी आवश्यक बंदोबस्त तैनात केला असून वाहनचालकांनी खालील पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
जाहीर करण्यात आलेले पर्यायी मार्ग
१) भुसावळ/नागपूरकडून धुळे/मुंबईकडे जाणारी वाहने :
तरसोद फाटा – कालिका माता मंदिर – अजिंठा चौफुली – आकाशवाणी चौक – शिव कॉलनी – बांभोरी पूल – पाळधी मार्गे.
२) मुंबई/धुळेहून भुसावळ/नागपूरकडे जाणारी वाहने :
पाळधी – बांभोरी – शिव कॉलनी – आकाशवाणी चौक – अजिंठा चौफुली – कालिका माता मंदिर – तरसोद फाटा मार्गे.
३) छत्रपती संभाजीनगरहून नागपूरकडे जाणारी वाहने :
पहूर – जामनेर – नाहाटा चौफुली – भुसावळ मार्गे.
४) नागपूरहून छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी वाहने :
भुसावळ – नाहाटा चौफुली – जामनेर – पहूर मार्गे.
५) इंदौर/बडोदा/नंदुरबारहून भुसावळ/नागपूरकडे जाणारी वाहने :
चोपडा – अडावद – यावल – भुसावळ मार्गे.
६) नागपूर/भुसावळहून नंदुरबार/बडोदा/इंदौरकडे जाणारी वाहने :
भुसावळ – यावल – अडावद – चोपडा मार्गे.
पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम (शहर वाहतूक शाखा, जळगाव) यांनी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असून सुरक्षित वाहतुकीसाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.








