रावेर(प्रतिनिधी):दि. 28 जून : रावेर तालुक्यात 24 जून रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे अहीरवाडी गावात पूरस्थिती निर्माण झाली होती. नाल्याकाठी राहणाऱ्या अनेक ग्रामस्थांच्या घरांचे नुकसान झाल्याने त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
पूरस्थितीनंतर रावेर पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी गावाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी पुरग्रस्त ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेत आवश्यक मदतीचे आश्वासन दिले.
या पार्श्वभूमीवर रविवारी (28 जून) रावेर पोलीस स्टेशनच्या वतीने अहीरवाडी येथे सुमारे 140 ते 150 पुरग्रस्त ग्रामस्थांना जेवणाचे वाटप करण्यात आले. या सामाजिक उपक्रमात पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील, पोलीस हवालदार सुनील वंजारी आणि पोलीस शिपाई तथागत सपकाळे यांनी सक्रिय सहभाग घेतला.
हा उपक्रम जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावीत यांच्या सामाजिक बांधिलकीच्या प्रेरणेतून तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या मदतकार्याबद्दल पुरग्रस्त ग्रामस्थांनी रावेर पोलिसांचे आभार व्यक्त करत समाधान व्यक्त केले.








