जळगाव : (प्रतिनिधी:इमरान खान):
जळगाव-ममुराबाद मार्गावरील म्हाळसादेवी मंदिराजवळ सोमवारी सायंकाळी भीषण अपघात झाला. भरधाव आयशर ट्रकच्या धडकेत कावड यात्रेत सहभागी झालेल्या ९ वर्षीय प्रबळ राजू गवळी याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी रास्ता रोको करत किराणा मालाने भरलेला आयशर ट्रक पेटवून दिला.

शनीपेठ परिसरातील गवळीवाडा येथून कावड यात्रा म्हाळसादेवी मंदिरात पोहोचली होती. पूजा व दर्शन आटोपून भाविक परतत असताना जळगावहून चोपड्याच्या दिशेने किराणा माल घेऊन जाणाऱ्या आयशर ट्रकने प्रबळला जोरदार धडक दिली. प्रत्यक्षदर्शींनुसार, धडकेनंतर मुलगा काही अंतरापर्यंत ट्रकसोबत फरफटत गेला.
अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी मोठ्या संख्येने नागरिक व नातेवाईक जमा झाले. संतप्त नागरिकांनी रस्ता रोखून धरत ट्रकचालकावर कठोर कारवाईची मागणी केली. याचदरम्यान जमावाने किराणा मालाने भरलेल्या आयशर ट्रकला आग लावली.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेत कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर परिस्थिती हळूहळू नियंत्रणात आली. या अपघातामुळे सायंकाळी सुमारे ५ ते ६.३० वाजेपर्यंत मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
या दुर्दैवी घटनेमुळे गवळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.








