लातूर(प्रतिनिधी):दि. २२ : शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन, लातूर येथे विद्यार्थिनींसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात सुमारे ८५० विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. कराटे व स्वसंरक्षण प्रशिक्षणासोबतच शिक्षण, करिअर, स्पर्धा परीक्षा, सायबर सुरक्षितता आणि व्यक्तिमत्त्व विकासाबाबत मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी तब्बल दोन तास विद्यार्थिनींशी संवाद साधत विविध विषयांवर मार्गदर्शन केले. “प्रथम शिक्षण पूर्ण करा, त्यानंतर स्पर्धा परीक्षेचा मार्ग निवडा,” असा महत्त्वपूर्ण सल्ला त्यांनी विद्यार्थिनींना दिला.

सध्या सुरू असलेल्या अभ्यासक्रमावर पूर्ण लक्ष केंद्रित करून शैक्षणिक पाया मजबूत करणे आवश्यक आहे. पदवी किंवा पदविका पूर्ण केल्यानंतर आपल्या आवडीच्या क्षेत्राचा विचार करून स्पर्धा परीक्षेची योग्य दिशा निश्चित करावी. यशासाठी सातत्य, नियोजन आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास आवश्यक असल्याचे तांबे यांनी सांगितले.

शारीरिक सामर्थ्यासोबत डिजिटल सुरक्षितताही महत्त्वाची
“कराटेच्या माध्यमातून तुम्ही शारीरिकदृष्ट्या सक्षम होत आहात; मात्र आजच्या डिजिटल युगात शारीरिक सामर्थ्यासोबत मानसिक आणि डिजिटल सुरक्षितताही तितकीच महत्त्वाची आहे,” असे सांगत तांबे यांनी सामाजिक माध्यमांच्या वापराबाबत विद्यार्थिनींना दक्ष राहण्याचे आवाहन केले.
अनोळखी व्यक्तींच्या मैत्री विनंत्या स्वीकारणे, वैयक्तिक माहिती किंवा छायाचित्रे अनावश्यकपणे सोशल मीडियावर शेअर करणे तसेच ऑनलाइन व्यवहार करताना निष्काळजीपणा करणे टाळावे. सायबर फसवणूक आणि सोशल मीडियाच्या गैरवापरापासून संरक्षणासाठी सतर्क राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आई-वडिलांचा विश्वास सार्थ ठरवा
कुटुंबीय मोठ्या विश्वासाने मुलींना शिक्षणासाठी बाहेर पाठवतात. या विश्वासाची जाणीव ठेवून शिक्षण आणि करिअरवर लक्ष केंद्रित करावे. स्वतःचे ध्येय निश्चित करून आत्मविश्वासाने पुढे जावे आणि यशस्वी करिअर घडवावे, असे आवाहन तांबे यांनी केले.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थिनींमध्ये शिक्षण, करिअर, स्वसंरक्षण आणि सायबर सुरक्षिततेबाबत नवी दिशा व आत्मविश्वास निर्माण झाल्याची भावना प्राचार्यांनी व्यक्त केली. व्यस्त दिनक्रमातून दोन तास वेळ देऊन विद्यार्थिनींशी थेट संवाद साधल्याबद्दल तंत्रनिकेतनच्या वतीने तांबे यांचे आभार मानण्यात आले.
या कार्यक्रमातून ८५० विद्यार्थिनींना स्वसंरक्षणासोबतच शिक्षण, करिअर नियोजन, स्पर्धा परीक्षा आणि डिजिटल युगातील सुरक्षिततेचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मिळाले.








