जळगाव : (प्रतिनिधी: इमरान खान):
जळगाव शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासह वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात शहर वाहतूक शाखेने बुधवार, दि. १९ ऑगस्ट रोजी विशेष नाकाबंदी मोहीम राबविली. इच्छादेवी चौक, आकाशवाणी चौक तसेच महामार्गावर ही कारवाई करण्यात आली.
ही मोहीम पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. परीविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्रीमती सह्याद्री बिरले, पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम यांच्यासह शहर वाहतूक शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदारांनी कारवाईत सहभाग घेतला.

नाकाबंदी मोहिमेदरम्यान हेल्मेट न वापरणे, मद्यप्राशन करून वाहन चालविणे, अवैध प्रवासी वाहतूक तसेच इतर वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

पोलीस विभागाच्या माहितीनुसार, मोहिमेत एकूण ३३७ प्रकरणांमध्ये २ लाख ६० हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यामध्ये हेल्मेटसह विविध वाहतूक नियमभंगाच्या प्रकरणांचा समावेश आहे. तसेच मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या चालकांविरुद्ध आणि अवैध प्रवासी वाहतुकीविरुद्धही स्वतंत्र कारवाई करण्यात आली.
शहरातील वाहतूक शिस्त कायम राहावी आणि वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, यासाठी अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे शहर वाहतूक शाखेकडून सांगण्यात आले.








