मेहरुण (प्रतिनिधी): स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तिरंगा सायकल रॅली उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात पार पडली. या रॅलीत विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत सायकलींवर तिरंगा ध्वज लावून राष्ट्रप्रेमाचा संदेश दिला.
रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी ‘वंदे मातरम्’, ‘भारत माता की जय’ अशा देशभक्तिपर घोषणा देत परिसर दुमदुमून टाकला. हातात तिरंगा घेऊन शिस्तबद्ध पद्धतीने सायकल चालविणाऱ्या विद्यार्थ्यांमुळे संपूर्ण मेहरुण परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले.
राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता, पर्यावरण संवर्धन तसेच सायकल वापराचे महत्त्व याबाबत जनजागृती करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. विद्यार्थ्यांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करत रॅली यशस्वीरीत्या पूर्ण केली.
विद्यालयाचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व स्वयंसेवकांच्या सहकार्याने या रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीच्या यशस्वी आयोजनाबद्दल सहभागी विद्यार्थी, शिक्षक आणि आयोजकांचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.








