मेहरूण (प्रतिनिधी: सरिता महाजन) : जळगाव शहर महानगरपालिका आणि यूथ ऑर्गनायझेशन फॉर ग्रीन इंडिया (योगी) यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या “जळगाव क्लायमेट वॉरियर्स” अभियानांतर्गत श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे विद्यार्थ्यांच्या पुस्तकांना प्लास्टिकऐवजी कागदी कव्हर लावण्याचा पर्यावरणपूरक उपक्रम उत्साहात राबविण्यात आला.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी विद्यार्थ्यांना प्लास्टिक डबे, प्लास्टिक बाटल्या आणि प्लास्टिक कव्हरचा वापर टाळण्याचे आवाहन केले. त्याऐवजी स्टीलचे डबे, स्टीलच्या बाटल्या तसेच जुन्या वर्तमानपत्रांपासून तयार केलेले कागदी कव्हर वापरण्याचा संदेश त्यांनी दिला. पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या दैनंदिन जीवनात प्लास्टिकचा वापर कमी करून पर्यावरणपूरक सवयी अंगीकारणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
चालू शैक्षणिक वर्षापासून विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांच्या पुस्तकांना कागदी कव्हर लावणे बंधनकारक करण्यात आले असून प्लास्टिक कव्हर वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. विद्यालयाच्या पर्यावरण समितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जुन्या वर्तमानपत्रांचा पुनर्वापर करून पुस्तकांना कव्हर लावण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला.
प्लास्टिकमुक्त शाळा अभियानांतर्गत यापुढेही विविध जनजागृतीपर आणि कृतीशील उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी दिली.








