लातूर(प्रतिनिधी ):दि. 8 जून : नागरिकांचे हरवलेले मोबाईल शोधून त्यांना परत देण्याची उल्लेखनीय कामगिरी गांधी चौक पोलीस ठाण्याने केली आहे. पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने तांत्रिक तपासाच्या मदतीने एकूण 10 हरवलेले मोबाईल शोधून संबंधित मालकांच्या ताब्यात दिले.
गांधी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बसस्थानक, गंजगोलाई, मार्केट यार्ड, कापड लाईन, सराफ लाईन आदी परिसरातून मोबाईल हरवल्याबाबत नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शोधमोहीम राबविण्यात आली.
गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सुनील रेजितवाड यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली. पथकातील पोलीस अंमलदार योगेश चिचोलीकर यांनी CEIR पोर्टलच्या माध्यमातून तांत्रिक तपास करून हरवलेले मोबाईल शोधून काढले.
या कारवाईदरम्यान सुमारे 2 लाख रुपये किमतीचे 10 मोबाईल हस्तगत करण्यात आले. आवश्यक पडताळणीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर हे मोबाईल संबंधित मालकांना परत करण्यात आले.
हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी गांधी चौक पोलिसांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. पोलिसांच्या तत्परतेचे, जनसेवेप्रती असलेल्या बांधिलकीचे आणि तांत्रिक कौशल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. नागरिकांच्या मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी पोलीस प्रशासन सातत्याने कार्यरत असल्याचे या कारवाईतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.








