नांदेड(प्रतिनिधी):दि. ५ : नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांवर लगाम घालण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या निर्देशानुसार विशेष पथकाने लातूर व हिंगोली जिल्ह्यांत धडक कारवाया करत तब्बल १ कोटी २५ लाख ९३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
विशेष पथकाने ३ जून रोजी लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील भाजी मार्केट परिसरात भारत फ्रूट कंपनीजवळ सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत १७ हजार ८९० रुपयांची रोकड आणि १४ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल जप्त करण्यात आले. या प्रकरणी तीन आरोपींना ताब्यात घेऊन अहमदपूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
त्यानंतर बसस्थानकाजवळील शेडमध्ये सुरू असलेल्या ‘तितली भवरा’ जुगार अड्ड्यावरही पथकाने कारवाई केली. येथे १३ हजार ८१० रुपयांची रोकड आणि १८ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल जप्त करण्यात आले. या प्रकरणात चार आरोपींना ताब्यात घेऊन महाराष्ट्र जुगार कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला.
दरम्यान, हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने मौजे चिमेगाव शिवारातील पूर्णा नदीच्या वाळू घाटावर धाड टाकली. या कारवाईत तीन हायवा, दोन जेसीबी मशीन, एक ट्रॅक्टर तसेच नदीपात्रातून बाहेर काढून ठेवलेली १० ब्रास वाळू असा एकूण १ कोटी २५ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी विविध कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल इंगोले करीत आहेत.
या तिन्ही कारवायांमध्ये पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांच्यासह प्रदीप खानसोळे, संजीव जिंकलवाड, गणेश धुमाळ आणि कामाजी गवळी यांनी सहभाग घेतला. पथकाच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.








