अण्णाभाऊ साठे पुण्यतिथीनिमित्त ‘फकीरा’ वाचन मॅरेथॉन; विद्यार्थ्यांनी जोपासली वाचन संस्कृती

Spread the love

मेहरुण (प्रतिनिधी): लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे संस्थाध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या संकल्पनेतून ‘फकीरा’ वाचन मॅरेथॉन या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविणे, साहित्यप्रेम वाढविणे, चिकित्सक विचारसरणी विकसित करणे तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक व सामाजिक कार्याचा परिचय करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

कार्यक्रमाची सुरुवात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. यावेळी उपशिक्षिका सुवर्णा अंभोरे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्य, साहित्यसंपदा आणि सामाजिक योगदानाचा परिचय करून देत समता, श्रमप्रतिष्ठा, सामाजिक न्याय आणि शिक्षणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.

 

यानंतर इयत्तानिहाय विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या गाजलेल्या ‘फकीरा’ कादंबरीतील निवडक उताऱ्यांचे सलग वाचन केले. प्रत्येक विद्यार्थ्याने वाचनानंतर त्या उताऱ्याचा आशय स्वतःच्या शब्दांत मांडल्याने वाचन कौशल्यासोबतच आकलनशक्ती, अभिव्यक्ती, आत्मविश्वास आणि संवादकौशल्याचा विकास झाला.

 

यावेळी फकीरा, वारणेचा वाघ, पाझर, वैजयंता आणि माझी मुंबई यांसह अण्णाभाऊ साठे यांच्या विविध साहित्यकृतींची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. त्यांच्या साहित्यामधून सामाजिक परिवर्तन, मानवी मूल्ये, संघर्षशील जीवन आणि समतेचा संदेश प्रभावीपणे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला.

 

मुख्याध्यापक मुकेश सुरेश नाईक यांनी मार्गदर्शन करताना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) विद्यार्थ्यांमध्ये वाचन, आकलन आणि विचारशक्ती विकसित करण्यावर भर देत असल्याचे सांगितले. ‘फकीरा’ वाचन मॅरेथॉनसारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची सवय रुजून भाषिक कौशल्य आणि सामाजिक मूल्यांची जाणीव विकसित होते, असे त्यांनी नमूद केले.

 

कार्यक्रमास पर्यवेक्षिका शितल कोळी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या उत्साहाने उपस्थित होते. समारोपावेळी विद्यार्थ्यांनी “दररोज वाचू, नवे शिकू आणि सुजाण नागरिक घडू” अशी सामूहिक वाचन प्रतिज्ञा घेतली.

 

संस्थाध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे पालकांनीही कौतुक केले. विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविणारा, साहित्याविषयी आत्मीयता निर्माण करणारा आणि सामाजिक जाणीवा समृद्ध करणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरला.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

जळगावात कथित तोतया पत्रकारांचा वावर; चौकशी व कारवाईची मागणी

जळगाव(प्रतिनिधी : इमरान खान):जळगाव शहरासह जिल्ह्यात स्वतःला पत्रकार म्हणून सादर करणाऱ्या काही व्यक्तींच्या हालचालींमुळे प्रशासन, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे....

कर्नाटक एक्स्प्रेसमधून ६० हजारांचा पानमसाला जप्त

भुसावळ(प्रतिनिधी: इमरान खान): कर्नाटक एक्स्प्रेसमधून सुगंधित पानमसाला व तंबाखूची वाहतूक करणाऱ्या एका प्रवाशाकडून तब्बल ६० हजार २८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भुसावळ...

विद्यार्थ्यांच्या तिरंगा सायकल रॅलीने मेहरुणमध्ये निर्माण केले देशभक्तीचे वातावरण

मेहरुण (प्रतिनिधी): स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली तिरंगा सायकल रॅली उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात...

संपादक - रजत शेख

Latest