मेहरुण(प्रतिनिधी ):जळगाव : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण यांच्या वतीने भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. हातात तिरंगा आणि मनात राष्ट्रभक्तीची भावना घेऊन विद्यार्थ्यांनी उत्साहात रॅलीत सहभाग नोंदवत राष्ट्रप्रेमाचा संदेश दिला.
रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी “तिरंगा हातात, भारत हृदयात!”, “माझा देश, माझी जबाबदारी!” तसेच “स्वातंत्र्य मिळाले… आता भारत घडवायचा आहे!” अशा विविध संदेशांचे फलक हातात घेतले होते. या माध्यमातून राष्ट्रप्रेमाबरोबरच शिस्त, कर्तव्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारी आणि आदर्श नागरिकत्वाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
रॅलीचे विशेष आकर्षण विद्यार्थ्यांनी सादर केलेले प्रेरणादायी पोस्टर प्रदर्शन ठरले. देशाचा इतिहास, तिरंग्याचा प्रवास, स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान, ‘वंदे मातरम्’, भारतीय संविधान आणि नागरिकांची कर्तव्ये यांसारख्या विषयांवर विद्यार्थ्यांनी माहितीपूर्ण पोस्टर सादर करून जनजागृती केली.
यावेळी “जंक फूडला नकार, विद्यार्थ्यांच्या आरोग्याला होकार!” हा आरोग्यविषयक संदेशही विद्यार्थ्यांनी दिला. निरोगी जीवनशैली, सकस आहार आणि आरोग्यदायी सवयी अंगीकारण्याचे आवाहन रॅलीच्या माध्यमातून करण्यात आले.
या उपक्रमातून “देशभक्ती म्हणजे केवळ घोषणा नव्हे, तर आपल्या कृतीतून देशासाठी योगदान देणे” हा महत्त्वपूर्ण संदेश विद्यार्थ्यांनी समाजापर्यंत पोहोचविला. मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसर देशभक्तीच्या रंगात रंगून गेला आणि रॅली उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.








