जळगाव(प्रतिनिधी: इमरान खान)दि. 7 ऑगस्ट – गोमांस विक्री होत असल्याचा खोटा आरोप करत घरात जबरदस्तीने प्रवेश करून पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे तांबापुरा परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तांबापुरा येथील रहिवासी रफिक फकीर मोहम्मद कुरेशी (वय 40) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार, शुक्रवारी (दि. 7) सकाळी सुमारे 7 वाजेच्या सुमारास कोमल बापुराव पाटील आणि जितेंद्र रूपसिंग चौधरी (दोघे रा. चोपडा, जि. जळगाव) हे फिर्यादीच्या घरी आले. त्यांनी स्वतःला पत्रकार असल्याचे सांगत घराचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, घरात म्हशीच्या रेडक्याचे मांस ठेवलेले असताना आरोपींनी त्याचे मोबाईलद्वारे चित्रीकरण केले. तसेच हे गोमांस असल्याचा आरोप करून संबंधितांवर कारवाई करण्याची धमकी दिली. यावेळी फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांनी ते गोवंशाची कत्तल करत नसून म्हशीच्या रेडक्याचे मांस विक्रीसाठी ठेवले असल्याचे स्पष्ट केले.
त्यानंतर आरोपींनी कारवाई टाळायची असल्यास पाच लाख रुपये द्यावे लागतील, अन्यथा पोलिसांत गुन्हा दाखल करून तुरुंगात पाठवू, अशी धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. ही पैशांची मागणी काही स्थानिक नागरिकांसमक्ष करण्यात आल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, आरोपींनी एमआयडीसी पोलिसांना गोमांस विक्री होत असल्याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासादरम्यान संबंधित मांस हे गोवंशाचे नसून म्हशीचे असल्याची खात्री झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर आरोपी तेथून निघून गेल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी रफिक कुरेशी यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात कोमल बापुराव पाटील आणि जितेंद्र रूपसिंग चौधरी यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 308(2), 333, 351(2) आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास उपनिरीक्षक राजेंद्र मनोहर उगले करीत आहेत.








