जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील नेहरू नगर परिसरातील एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल २३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहरू नगर येथील रहिवासी गोविंद रामदास पाटील (वय ५७) हे घर बंद करून बाहेर गेले असताना ८ जून रोजी सकाळी ९.३० ते १० जून रोजी दुपारी ४ वाजेदरम्यान चोरट्यांनी त्यांच्या घराला लक्ष्य केले. घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत चोरट्यांनी मौल्यवान वस्तूंवर हात साफ केला.
चोरी झालेल्या ऐवजात सुमारे १५ हजार रुपये किमतीचे ६ चांदीचे देव (अंदाजे ६० ग्रॅम वजन), ३ हजार रुपये किमतीची एचपी कंपनीची गॅस शेगडी तसेच ५ हजार रुपये किमतीची पितळी व तांब्याची भांडी यांचा समावेश असून एकूण नुकसान २३ हजार रुपयांचे झाले आहे.
घरफोडीची घटना लक्षात आल्यानंतर गोविंद पाटील यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(अ), ३३१(३) आणि ३३१(४) अन्वये अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलिस कर्मचारी किरण चौधरी करीत असून, घरफोडी करणाऱ्या चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे.








