जळगाव( प्रतिनिधी ): शहरातील वाढत्या अतिक्रमणांविरोधात जळगाव महानगरपालिकेने आक्रमक भूमिका घेत बुधवारी तिजोरी गल्ली परिसरात धडक कारवाई केली. अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने अचानक छापा टाकत रस्त्यावर ठेवण्यात आलेली ७ मोठी लोखंडी कपाटे जप्त केली. कारवाईदरम्यान व्यापारी आणि महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये वादावादी झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, प्रशासनाने विरोधाला न जुमानता कारवाई पूर्ण केली.
तिजोरी गल्ली परिसरात लोखंडी कपाटांची दुरुस्ती, मालाची चढ-उतार आणि इतर व्यावसायिक कामे थेट रस्त्यावर होत असल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत होता. याबाबत नागरिकांकडून वारंवार तक्रारी प्राप्त झाल्यानंतर महापालिकेने ही कारवाई केली.
महापौर दीपमाला काळे यांनी शहरातील अतिक्रमणांविरोधात कठोर भूमिका घेतली असून त्यांच्या निर्देशानुसार अतिक्रमण निर्मूलन विभागाने ही विशेष मोहीम राबवली. कारवाईदरम्यान रस्त्यावरील बेकायदेशीर साहित्य हटवून जप्त करण्यात आले.
शहरातील विविध भागांतही मोहीम
तिजोरी गल्लीसह चित्रा चौक, दाणा बाजार, सुभाष चौक, फुले मार्केट आणि छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल परिसरातही अतिक्रमणविरोधी मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या १३ लोटगाड्या, ७ लोखंडी पेट्या तसेच इतर व्यावसायिक साहित्य जप्त करण्यात आले.
संवेदनशील भागांत बैठी पथके तैनात
कारवाईनंतर पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी महापालिकेने विशेष खबरदारी घेतली आहे. अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या वतीने महाराणा प्रताप पुतळा परिसर, गणेश कॉलनी रस्ता आणि जुना कापड बाजार (मसाला गल्ली) या संवेदनशील भागांत दिवसभरासाठी बैठी पथके तैनात करण्यात आली आहेत.
महापालिकेच्या या धडक कारवाईमुळे शहरातील अतिक्रमण करणारे व्यापारी आणि फेरीवाले यांच्यात खळबळ उडाली असून, आगामी काळात अशाच मोहिमा अधिक तीव्रतेने राबविण्यात येणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.








