जळगाव(इमरान खान) : शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर बुधवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात भाजी विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या ५५ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर तिचा मुलगा जखमी झाला. भरधाव टँकरने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. अपघातानंतर चालक पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना सतर्क नागरिकांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडून एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले.

हा अपघात अजंठा चौफुलीपूर्वी हॉटेल दिल्ली दरबार व सीएनजी गॅस पंपासमोर बुधवारी सकाळी घडला.

मृत महिलेची ओळख मंगला अर्जुन माळी (वय ५५, रा. ज्ञानदेव नगर) अशी झाली आहे. त्या नेहमीप्रमाणे आपला मुलगा भरत माळी (वय २९) याच्यासोबत दुचाकीवरून पिंप्राळा साप्ताहिक बाजारात भाजी विक्रीसाठी जात होत्या.
यावेळी मागून भरधाव वेगाने आलेल्या टँकरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेमुळे मंगला माळी रस्त्यावर कोसळल्या आणि टँकर त्यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात त्यांचा मुलगा भरत माळी जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर टँकर चालक वाहनासह पाळधीच्या दिशेने पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, स्थानिक नागरिकांनी तत्काळ त्याचा पाठलाग केला. आकाशवाणी चौकातील महादेव हॉस्पिटलसमोर टँकर अडवून चालकाला पकडण्यात आले. त्यानंतर त्याला एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
मंगला माळी या अनेक वर्षांपासून भाजी विक्रीचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होत्या. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन सुना तसेच नातवंडे असा परिवार आहे.
या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालविणाऱ्यांवर कठोर कारवाई करून कडक शिक्षा देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, या प्रकरणी एमआयडीसी पोलीस अधिक तपास करीत आहेत.








