चाळीसगाव(प्रतिनिधी):शासनाच्या मनरेगा योजनेतील लाभार्थ्याच्या बिलासाठी कमिशनची मागणी करणाऱ्या सामाजिक वनीकरण विभागाच्या वनपालाला नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. प्यारेलाल विठ्ठल महाजन (वनपाल, सामाजिक वनीकरण परिक्षेत्र चाळीसगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
मौजे तरवाडे (ता. चाळीसगाव) येथील एका शेतकऱ्याने चंदन वृक्ष लागवड व संवर्धनासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत अर्ज केला होता. या योजनेतून संबंधित लाभार्थ्यास तीन वर्षांसाठी एकूण ४ लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर झाला होता.
वृक्ष लागवडीसाठी करण्यात आलेल्या कुशल कामाचे ५० हजार रुपयांचे बिल मंजूर करून देण्यासाठी वनपाल प्यारेलाल महाजन यांनी बिलाच्या रकमेच्या १५ टक्के प्रमाणे ७,५०० रुपयांची लाच मागितल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली. एसीबीने केलेल्या पडताळणीत २४ जून रोजी पंच साक्षीदारांसमक्ष लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाले.
यानंतर नाशिक एसीबीच्या पथकाने सापळा रचून आरोपीला ७,५०० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
ही कारवाई पोलीस निरीक्षक नेहा सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विनोद चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल अनिल गांगोडे, पोलीस शिपाई योगेश शिंदे तसेच पोलीस निरीक्षक हेमंत नागरे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
दरम्यान, कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी शासकीय कामासाठी लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी तातडीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार नोंदवावी, असे आवाहन एसीबीकडून करण्यात आले आहे.








