ठाणे( प्रतिनिधी) : रिक्षामध्ये विसरून गेलेल्या तब्बल १५ तोळे सोन्याचे दागिने असलेल्या बॅगेचा शोध घेऊन ती सुरक्षितपणे मालकिणीकडे परत सुपूर्द करण्याची उल्लेखनीय कामगिरी नौपाडा पोलिसांनी केली आहे. या कामगिरीमुळे ठाणे शहरातील नागरिकांकडून नौपाडा पोलीस ठाण्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खारेगाव (कळवा) येथील रहिवासी वंदना मनोज म्हात्रे या २ जून २०२६ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास खारेगाव नाका येथून रिक्षाने तुळजाभवानी मंदिर, नौपाडा येथे जात होत्या. प्रवासादरम्यान त्या रिक्षामध्ये त्यांची बॅग विसरून गेल्या. या बॅगेत सुमारे १५ तोळे सोन्याचे दागिने तसेच इतर मौल्यवान साहित्य होते.
याबाबत त्यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार प्रॉपर्टी मिसिंग क्रमांक ८०२/२०२६ अंतर्गत नोंद करण्यात आली. तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तातडीने शोधमोहीम सुरू केली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश भांगे, पोलीस हवालदार विलास देसाई, पोलीस शिपाई सारंग कांगणे आणि अनिकेत उभे यांनी घटनास्थळापासून रिक्षाने घेतलेल्या संभाव्य मार्गावरील सुमारे ७० ते ८० शासकीय व खासगी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज बारकाईने तपासले. या तपासातून एमएच-०४-जे-क्यू-७८२६ क्रमांकाची रिक्षा निष्पन्न झाली.
यानंतर पोलिसांनी रिक्षामालक राजू साव याचा शोध घेऊन त्याच्याकडून हरवलेली बॅग आणि त्यातील १५ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले. त्यानंतर हा सर्व मुद्देमाल वंदना म्हात्रे यांना परत करण्यात आला.
ही यशस्वी कारवाई पोलीस उपआयुक्त बाळासाहेब पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त संभाजीराव जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, पोलीस निरीक्षक संजय दवणे आणि पोलीस निरीक्षक राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
नागरिकांच्या हरवलेल्या मौल्यवान वस्तू शोधून परत मिळवून देण्यासाठी नौपाडा पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेचे शहरभरातून स्वागत व कौतुक केले जात आहे.








