जळगाव(प्रतिनिधी : सरिता महाजन):दि. ६ जुलै : जळगाव जिल्ह्यात अंमली पदार्थविरोधी कारवाईत जप्त करण्यात आलेल्या ८ गुन्ह्यांतील एकूण ९३०.८२ किलो वजनाचा सुका गांजा, ज्याची अंदाजे किंमत १ कोटी ८६ लाख १६ हजार ४०० रुपये आहे, त्याचा सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आज जिल्हास्तरीय अंमली पदार्थ नाश समितीच्या उपस्थितीत नाश करण्यात आला.

मा. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे व मा. अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत यांच्या निर्देशानुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार तसेच केंद्र शासन, महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक आणि ANTF यांच्या सूचनांप्रमाणे जप्त अंमली पदार्थांचा तातडीने नाश करण्याची प्रक्रिया राबविण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तथा अंमली पदार्थविरोधी पथकाचे नोडल अधिकारी राहुल गायकवाड यांनी केंद्रीय मुद्देमाल कक्षातील जप्त अंमली पदार्थांचा आढावा घेऊन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झालेल्या ८ गुन्ह्यांतील गांजा नाशासाठी समितीकडे प्रस्ताव सादर केला. समितीने प्रस्तावाची पडताळणी करून त्यास मंजुरी दिली.
यानुसार जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या इमारतीमागील मोकळ्या जागेत खड्डा खोदून पर्यावरणाची कमीत कमी हानी होईल, अशा पद्धतीने गांजाचा नाश करण्यात आला. संपूर्ण नाश प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरणही करण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय अंमली पदार्थ नाश समितीच्या उपस्थितीत पार पडली. समितीचे सदस्य अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, पोलीस उपअधीक्षक (गृह) संजय गायकवाड, कृषी विभागाचे प्रतिनिधी विकास बोरसे, निरीक्षक (वजन-मापे) गौतम बाविस्कर तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.








