जळगाव(प्रतिनिधी): शहरातील रामेश्वर कॉलनी येथील श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्याच्या उद्देशाने अभिप्राय संकलन उपक्रम नुकताच उत्साहात पार पडला. या उपक्रमांतर्गत पालक व विद्यार्थ्यांकडून अध्यापन प्रक्रिया अधिक प्रभावी करण्यासाठी थेट अभिप्राय घेण्यात आला.
अभिप्राय फॉर्मच्या माध्यमातून अध्यापन पद्धती, विषय समज, शिक्षक-विद्यार्थी संवाद तसेच विद्यार्थ्यांच्या प्रगतीविषयी माहिती संकलित करण्यात आली. पालकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत उपयुक्त सूचना मांडल्या.
संकलित अभिप्रायाचे शिक्षक बैठकीत विश्लेषण करून अध्यापनात आवश्यक सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास चालना मिळणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
या उपक्रमासाठी मुख्याध्यापक मुकेश नाईक यांचे मार्गदर्शन लाभले, तर पर्यवेक्षिका शीतल कोळी यांनी नियोजन व समन्वयाची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली.
उपक्रमात शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.